मंगळवार, २८ जुलै, २००९

बेरंग !

महाजालावरचे अजून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्री. नरेंद्र गोळे.....व्यवसायाने विद्युत अभियंता असणारे गोळेसाहेब साहित्य,संगीत इत्यादि कलांमध्येही तितकीच रुची बाळगून आहेत. प्रवासवर्णनं,कविता,भाषांतर,योग आणि आरोग्य अशा विविध प्रांतात ते सहजपणाने मुशाफिरी करतात.
त्यांनी लिहिलेली ही चारोळी वाचली आणि छान वाटली.म्हणून चाल लावण्याचा प्रयत्न केला. आधी बराच वेळ काहीच जमत नव्हते पण जसजशी चारोळी अधिक वेळा वाचत गेलो तशी चालही सुचत गेली. ऐकून पाहा आणि सांगा कशी वाटली चाल?

बेरंग

विहरलो वार्‍यापरी मी कधीचा, तरी मी मुळी अनिरुद्ध नाही ।
लाभला मज कुणाचा संग नाही, तरी मी मुळी निस्संग नाही ।।
रचनेस माझ्या कोणताही बंध नाही, तरी तीही अनिर्बंध नाही ।
मी न गहिरे रंग भरले तरीही, चित्र माझे एकही बेरंग नाही ॥

कवी:नरेंद्र गोळे

इथे चाल ऐका.

ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

विशाल कुलकर्णीने लिहिलेले हे एक बालगीत वाचून मला चाल लावाविशी वाटली. जमलेय का पण ती चाल?
तुम्हीच ऐका आणि ठरवा.

ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?
ए आई......,सांग नाऽऽऽऽऽ!

आता गोष्ट नको आम्हाला,
गाण्यातला रस संपला!
लुटुपुटीच्या भातुकलीचा,
आला खुप खुप कंटाळा ऽऽऽऽ!
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

नकोच आई मजला,
चॉकलेटचा तो बंगला !
अन बर्फीची ती झाडे,
इथे आहेत, हवीऽऽऽऽ कुणाला?
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

राजपुत्र अन परीराणीच्या,
गोष्टींचा स्टॉकही संपला !
टॉम अँड जेरी, पापायनेही,
बघ जीव; आमचाऽऽऽ उबला !
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

चिवचिव करती चिमणपिले,
चोचीतच घास राहीला !
असेल का गं गेला ?
त्यांचाही बाबा टूरऽऽऽ ला?
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

बघ चांदोबा तो रुसला,
चांदण्याही..., बघ धुसफुसल्या !
अंगाई नच रुचे आम्हाला,
आम्हा हवाय बाबा......, थोपटायलाऽऽऽऽऽ !
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

कवी:विशाल कुलकर्णी

चाल इथे ऐका.

रविवार, २६ जुलै, २००९

सागर किनारी...

उमेश कोठीकर हे मायबोली आणि मिसळपाववर नियमित कविता लिहितात. त्यांची ही कविता वाचून मला एक हलकीफुलकी चाल सुचली. ऐकून सांगा कशी वाटली ते.


सागर किनारी..

सागर किनारी
दोघेच असावे
बोलता बोलता
मिठीत शिरावे

मिठीत शिरून
लटके रुसावे
प्रेमाच्या आर्जवी
खुदकन हसावे

खुदकन हसूनी
भुलावे झुलावे
रुपेरी वाळूत
पाउल नाचावे

नाचत हळूच
हात हे गुंफावे
स्पंदन प्रेमाचे
हृदयी ऐकावे

हृदयी ऐकावे
डोळ्यांत बघावे
निळुल्या पाण्यात
डुंबुनी यावे

डुंबता डुंबता
श्वास हे दुणावे
ओठांचे अमृत
ओठांत शिरावे

ओठांत शिरूनी
गुलाबी जगावे
स्वप्नांच्या गर्भाचे
बीज तू व्हावे!

कवी: उमेश कोठीकर

चाल इथे ऐका.

शनिवार, २५ जुलै, २००९

जाता जाता !...माझी ५०वी चाल!

धोंडोपंतांची ही अजून एक सशक्त गजल. मूळ गजलेतील काही निवडक शेर मी चाल लावण्यासाठी घेतलेत. चाल ऐकून आपले मत जरूर नोंदवा.

मंडळी,सांगावयास आनंद होतोय की ही माझी ५०वी चाल ठरलेय.


जाता जाता

जिथे तिथे मी हर्ष पेरला... जाता जाता
आनंदाचा मळा फुलवला... जाता जाता

समोर तू येताच अचानक मी गडबडलो
एकच ठोका हृदयी चुकला... जाता जाता

दोन शेर लिहिल्यावर होती गझल रखडली
तू दिसल्यावर तिसरा सुचला... जाता जाता

असा काय गंभीर गुन्हा मी केला आहे?
एकच चिमटा तुला काढला... जाता जाता

तुझे इशारे तुझ्या खुणा लाजवाब होत्या
अर्थ मला पण उशिरा कळला... जाता जाता

हासत खेळत भेट आपुली झाली तरिही
कंठ का बरे तुझा दाटला... जाता जाता

खूप प्रयासाने थोपवले होते अश्रू
बांध शेवटी उगीच फुटला... जाता जाता

"संवादाची तुझ्या ’अगस्ती’ ही तर किमया"
"रडणाराही अखेर हसला... जाता जाता"

कवी:धोंडोपंत

चाल इथे ऐका.

ऋतू न्याराच !

जयंता५२ म्हणजेच जयंतराव कुलकर्णींची ही अजून एक सशक्त गजल.मूळ गजलेत ६ शेर आहेत पण मी चाल लावण्यासाठी पहिले चारच वापरलेत. ह्या गजलेला लावलेली चाल कशी वाटतेय ते ऐकून पाहा.

ऋतू न्याराच

ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?

कवी:जयंता५२

इथे चाल ऐका.

रिमझिम येता वळवाची सर---

मिसळपाव ह्या संकेतस्थळावर नियमित कविता लिहिणार्‍यांपैकी एक आहे पुष्कराज. त्याची ’रिमझिम येता वळवाची सर’ ही कविता वाचली आणि एकदम आवडून गेली. वाचता वाचता चालही उलगडत गेली. तीच इथे चढवलेय. बघा आवडते का ते?

रिमझिम येता वळवाची सर---

रिमझिम येता वळवाची सर
मातीतून मग तुझाच दरवळ
पानोपानी तूच खेळ्सी
ह्र्दय छेडते पुन्हा तुझे स्वर
रिमझिम येता वळवाची सर

स्वरांतूनी तू उमलुनी येसी
माझी होउन मिसळूनी जासी
विहारुनी त्या स्वरांतून मी
सहजच येतो पुन्हा समेवर
रिमझिम येता वळवाची सर

चेहर्‍यावर तव अवखळ गोडी
चंचलता ती यौवन वेडी
अधीर उत्कट फुलूनी येती
मोती अगणित तव अधरावर
रिमझिम येता वळवाची सर

सहज मोती ते टिपूनी घ्यावे
अपूर्ण काही राहून जावे
अन् वळवाचे वेड धरावे
स्वर्गातुन मग यावे भूवर
रिमझिम येता वळवाची सर

कवी:पुष्कराज

चाल इथे ऐका.

शुक्रवार, २४ जुलै, २००९

आज मिलन होणार गं...

बर्‍याच दिवसांनी दीपिका जोशी ह्यांची ही सहजसुंदर कविता वाचनात आली आणि लगेच एक चाल सुचली.
ऐकून सांगा, कशी वाटतेय?

आज मिलन होणार गं...


मनमोर नाचणार गं..
आज मिलन होणार गं..

निशिगंध फुलोरा दरवळतो
गुंजनात भ्रमर सैरभैरतो
मोहरली धरती, आसमंत हसणार गं
आज मिलन होणार गं

चढणार साज ह्या सुरांना
नाद पाउलीच्या पैंजणांना
स्वर भारलेले, एक तान छेडणार गं
आज मिलन होणार गं...

कळ्या नाजूक समयीच्या
खुणवणार बटा भाळीच्या
अंग अंग वसंती आज मी फुलणार गं
आज मिलन होणार गं

कवयित्री: दीपिका जोशी




बुधवार, १५ जुलै, २००९

अशी कविता:एक कोडे

रेमी डिसोजा हे नाव मला तसे नवीन असले तरीही महाजालावर पक्के मुरलेले हे व्यक्तीमत्व दिसतंय. मराठी आणि इंग्रजीमधून ह्यांनी गद्य आणि पद्य लेखन खूपच मोठ्या प्रमाणावर केलेलं दिसतंय.
माझा तरूण मित्र प्रशांत मनोहरने रेमीच्या जालनिशीवरची ही खाली दिलेली कविता वाचली आणि मला त्याला चाल लावायचे आव्हान दिले. ह्या कवितेत प्रत्यक्ष कविनेही म्हणून ठेवलंय की..."ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत."
मी कविता वाचली आणि लक्षात आले की त्याला चाल लागू शकते. म्हणून मग त्याचे आव्हान स्वीकारले आणि त्याप्रमाणे जी चाल साकारली ती इथे देत आहे. ऐका आणि कितपत जमलेय तेही सांगा.

अशी कविता: एक कोडें

ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?

कवी:रेमी डिसोजा

इथे चाल ऐका

प्रेम आईचे!

प्रशांत मनोहर हा एक मनस्वी कलाकार आहे.पद्य लेखनात तो निरनिराळे प्रकार हाताळतो. त्याने लिहीलेले ’प्रेम आईचे’ हे हायकू वाचून मला गंमत वाटली आणि त्याला चाल लावाविशी वाटली. फक्त तीन ओळींचे... असे म्हणण्याऐवजी ६ शब्दांचे किंवा ५-७-५ अक्षरांचे ..असे हे छोटेखानी काव्य आहे. मग ह्याला चाल कशी लावावी? तुम्हीच पाहा ऐकून. जमली असली/नसली तरी तशी प्रतिक्रिया मात्र इथे नोंदवा.

प्रेम आईचे

शांत शीतल
चांदणे पुनवेचे
प्रेम आईचे

कवी:प्रशांत मनोहर

इथे चाल ऐका

सोमवार, १३ जुलै, २००९

बरसेल आता पाऊस!

व्यवसायाने ज्योतिषी असणारे धोंडोपंत आपटे हे महाजालावरचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कविता,गजल आणि गद्य लेखन ह्या तिन्ही प्रकारात त्यांचा हातखंडा आहे.
हल्लीच त्यांनी लिहीलेली एक कविता वाचली. वाचताक्षणीच एकदम आवडून गेली आणि सहजपणाने एक चालही सुचली. माझ्या, संगीतातील काही दर्दी मित्रांना ऐकवल्यावर त्यांच्या मते ती चाल जास्त उदास झालेय असे कळले. म्हणून अजून थोड्या वेगळ्या प्रकारे मी ह्या कवितेला चाल लावलेय. दोन्ही चाली आपल्यासाठी इथे सादर करतोय. कितपत जमल्या आहेत ते ऐकून सांगा.


पाऊस

मेघांची दाटी गगनी
तू अंत नको पाहूस
क्षण दोन क्षणांची खोटी
बरसेल अता पाऊस....

चल वेचू क्षण हे सखये
ये निघून लवकर आता
मी शब्द उधळतो आहे
दे सूर तुझे या गीता...

कवी: धोंडोपंत


पहिली चाल



दुसरी चाल

शनिवार, ४ जुलै, २००९

अंत!

क्रान्तिची अजून एक कविता तिच्या नेहमीच्या लौकिकाला साजेल अशी आशयपूर्ण आहे.



अंत

फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरुन जावे,
पाचोळ्यापरी अंत नको

जगणे अवघड झाले तेव्हा
दिला सुरांनी जन्म नवा
जन्मांतरी हे सूर भिनावे,
नुसता कोकिळकंठ नको

रंग-रूप, रस-गंध साठवित
फुलाफुलावर लहरत जावे
फूलपाखरू जीवन व्हावे,
कोशातिल सुरवंट नको

क्षणाक्षणाला कणाकणातुन
उसळावे चैतन्य अनोखे
खळाळते आयुष्य असावे,
गती कधीही संथ नको

अद्भुत काही असे घडावे
असणे-नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो, रडवून गेलो
इतका साधा अंत नको

कवयित्री: क्रान्ति

चाल इथे ऐका.