जयश्री अंबासकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जयश्री अंबासकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

का बंध रेशमाचे !

जयश्रीची ही गजल वाचून मला ही चाल सुचली.सोईसाठी काही निवडक द्विपदी घेतलेत.

का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही

त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही

बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही

डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही

जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही

जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही

कवयित्री: जयश्री अंबासकर

चाल इथे ऐका.

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

मौनाचं वादळ

जयश्रीच्या ह्या सहज-सोप्या शब्दांना मी अशी चाल लावली....

काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज

उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

कवयित्री: जयश्री अंबासकर

चाल इथे ऐका.

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

आज दिवाळी आली !

जयश्री अंबासकरने लिहिलेले हे नवे दिवाळीवरील काव्य वाचलं आणि जी चाल स्फुरली ती इथे देत आहे...जरूर ऐका.

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

नको आणखी.

जयश्रीची ही नवी गजल वाचली  आणि त्यातल्या मला आवडलेल्या  काही निवडक द्विपदींचा समावेश करून  त्यांना लावलेली चाल ध्वनिमुद्रित केली. ऐकून सांगा  कशी वाटते.

नको आणखी

फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी


नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी

धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी

जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी

जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी

कवयित्री: जयश्री अंबासकर


रविवार, ५ एप्रिल, २००९

भूल!

जयश्रीची ही अशीच एक भावपूर्ण कविता वाचा. ह्या कवितेला मी जरा उडती चाल लावलेय. कितपत जमलेय सांगा बरं.

भूल

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला

चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली
बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली

सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा
मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला

यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला
धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला

शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली
का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले

कवयित्री: जयश्री अंबासकर

चाल ऐका.

दिवाळी गीत

जयश्रीचे २००८मध्ये दिवाळी ई-शुभेच्छापत्र आले आणि त्यावरील कविता वाचून लगेच चाल सुचली. बघा आवडतेय का?
खाली चित्र स्वरूपात कविता आहे.

शनिवार, ४ एप्रिल, २००९

उन्मुक्त!

सौ.जयश्री कुलकर्णी-अंबासकर! महाजालावरील मराठी संकेतस्थळांवरची एक लोकप्रिय कवयित्री!
सुप्रसिद्ध संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा एक संच आहे "स्पर्श चांदण्यांचे". त्यात जयश्रीची दोन स्वतंत्र गाणी आहेत आणि एका द्वंद्व गीतातही तिचा अर्धा सहभाग आहे.ही गाणी सुप्रसिद्ध गायक श्री.सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणी ह्यांनी गायलेली आहेत.
तिच्या गीतांचा एक संपूर्ण संच "सारे तुझ्यात आहे" ह्या नावाने प्रसिद्ध झालाय. संगीतकार आहेत अभिजित राणे आणि गायक गायिका आहेत स्वप्नील बांदोडकर,देवकी पंडीत आणि वैशाली सामंत.
तसेच "तुझा चेहरा" ह्या गायिका संगीता चितळेने गायिलेल्या गीत संचात जयश्रीचे एक गीत आहे.
अशा ह्या सुप्रसिद्ध कवयित्रीच्या "उन्मुक्त" ह्या कवितेला मला चाल लावायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.