शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

आज दिवाळी आली !

जयश्री अंबासकरने लिहिलेले हे नवे दिवाळीवरील काव्य वाचलं आणि जी चाल स्फुरली ती इथे देत आहे...जरूर ऐका.

सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

पहिले चुंबन!

उल्हास भिडे ह्यांची ही कविता वाचल्यावर जी चाल सुचली ती आपल्यासमोर ठेवत आहे.



शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

''वाटतो जरी प्रसन्न मी वरुन''

डॉक्टर कैलास गायकवाड ह्यांची ही सुंदर गजल वाचून जी चाल सुचली ती आपल्यासमोर सादर करत आहे...सोईसाठी फक्त चारच द्विपदी घेतलेल्या आहेत.

वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आत भरभरुन

झाकले उघड कसे करायचे?
ठेवले बरेच आज आवरुन

जिंकली असंख्य सौख्यसाधने
डाव जीवनात सारखे हरुन

धूम अश्व दौडतो मनातला
मी तसाच बांधतो पुन्हा धरुन

पोहणे न ज्ञात जाहले मला
जीवनात मी तरी असे तरुन

शुष्क भावना......... तरी तुझ्या सवे,
घाम का फुटे उगाच दरदरुन?

गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन

काळ यायची अवेळ जाहली
वाट पाहतो स्वतःस सावरुन

कवी: डॉ.कैलास गायकवाड

चाल इथे ऐका.

सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

श्री गणराया !...माझी ७५वी चाल.

गंगाधर मुट्यांनी ही गणेशाकडे भाकलेली करूणा मी चालबद्ध करतोय...ही महाजालावर ..म्हणजेच इथे चढवत असलेली माझी ७५वी चाल आहे. तशा शंभराच्यावर चाली लावून झालेत..पण आपल्यासारख्या रसिकांपुढे जाहीरपणाने मांडतोय अशी ही ७५वी चाल आहे...ऐकून सांगा चाल कशी आहे ते....
गंगाधर मुट्यांचे शब्द तर नेहमीप्रमाणेच चपखल आहेत...तेव्हा ऐका आता ही चाल.

बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

ती स्वप्नसुंदरी

गंगाधर मुटे...एक गावाशी आणि मातीशी घट्ट नातं जोडलेला कवीमाणूस. शेतीशी निगडीत अशा ह्या मुटेसाहेबांनी कवितांमध्ये निरनिराळे विषय हाताळलेले आहेत.गजल,हजल,निसर्गकविता, वास्तववादी कविता,गावरान कविता अशा विविध प्रकारे त्यांनी अतिशय सुंदर अशा काव्यरचना केलेल्या आहेत..त्यांची ही एक बहारदार पण तितकीच वास्तववादी कविता पाहा.




सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी

जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी

कवी: गंगाधर मुटे

चाल इथे ऐका.

शनिवार, २४ जुलै, २०१०

हा तोच किनारा फिरतो मी

राजेश घासकडवी ह्यांची ही तरल भावना व्यक्त करणारी कविता वाचा....कविता वाचता वाचताच तिची चालही अलगदपणे उलगडत गेली. कशी ते ऐका......

उजव्या बाजुस गजबजणारी तीच गाज घुमते अरबी
हा तोच किनारा फिरतो मी ।।धृ।।

दगडावरती झोकुन सारे
वार्‍यामनिचे गुपित खारे
लेउन लाटा उधळण करती तीच तुषारांची धुंदी ।।१।।

तोच दिवस त्या महिन्याचाही
तोच कोन त्या किरणांचाही
परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।।

धरून ऐना कुंद हवेला
तनामनाने हिरवुन गेला
तसा न सागर आज सांगतो जन्मजन्मीच्या गुजगोष्टी ।।३।।

केसांमधल्या लाटा सारत
शब्दहासरे तुषार बरसत
उजव्या बाजुस गाज रोखुनि चालत तू ना मजसाथी ।।४।।

काय बोललो तेव्हा आपण
कसे कुठे अन गेले ते क्षण
मनात ओल्या रेतीवरच्या त्याच खुणा धरल्या जपुनी ।।५।।

डाव्या बाजुस गाज अता ही
सूर्यास्ताची सरते तरिही
जादू उरली अजुनी अपुल्या स्पर्शधुंदीच्या लाटांची ।।६।।

कवी: राजेश घासकडवी

चाल इथे  ऐका

गुरुवार, २२ जुलै, २०१०

गाणी

क्रान्तिची ही अजून एक आशयघन कविता वाचा...त्यानंतर मला सुचलेली चालही ऐका.

आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली  गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||

दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम  लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||

भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून  झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||

नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||

निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||

असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?

कवयित्री: क्रान्ति

चाल इथे ऐका.