बुधवार, २१ जुलै, २०१०

अंतरंग

जयपाल ह्यांची ही साधी सोपी अशी रचना वाचून मला जी चाल सुचली ती ऐका.



पावसाच गाणं
मातीच न्हाणं
माझ समुद्र होण
अंतरंगी

ओला पक्षी
हिरवी नक्षी
मी एक साक्षी
अंतरंगी

चींब सर
ओली थरथर
अधिर हे अधर
अंतरंगी

उठे उधाण
नुरे देहभान
मन हे तुफान
अंतरंगी

झाकल्या खुणा
उघड्या पुन्हा
घडे काय गुन्हा?
अंतरंगी

कवी: जयपाल

चाल इथे ऐका

अरूपाचे रूप

आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने क्रान्तिने रचलेल्या ह्या अभंगाला मी चाल लावलेय...ऐकून पाहा आणि आवडली/नावडली तर तेही सांगा.

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई


भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत


दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग


भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात


मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

कवयित्री: क्रान्ति

चाल इथे ऐका.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

पार इस बारिश के है

तुषारची ही हिंदी कविता...हिलाही चाल लावलेय. बघा आवडतेय का ?

पार इस बारिश के है
सखी तेरा डेरा
कडकती है बिजली और
धडकाती है मन मेरा
-
चेहरे की मधुरिमा
आईने पार छाई
फूल बालों में सजाया
जिन्दगी महकाई
घाव काजल का लगे
पलकों पे कितना प्यार
पार इस बारिश के है
सखी तेरा डेरा
-
थाम लो अब आह को
ऑंसूओं थम जाओ
ना रे ना रे ना सखी
ऐसे भी मुरझाओ
गीत मनका मुस्कुराए
होठों पर अब मेरा
पार इस बारिश के है
सखी तेरा डेरा
-
हाथों पर मुसकाए ओले
हरियाली छाए
बुंदों का रोमांच मेरे
हाथों पर उग आए
भीगा भीगा ऑंसमा
हाथों में भर लो सारा
पार इस बारिश के है
सखी तेरा डेरा

तुषार जोशी,नागपूर


चाल इथे ऐका


मुक्त!

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानातील कारावासात तिथल्या भिंतीवर ’कमला’ नावाचे खंडकाव्य लिहिले. ते लिहिण्यासाठी त्यांना कागद-पेन/पेन्सिल मिळाले नाही...म्हणून त्यांनी ते भिंतीवर लिहिले असा इतिहास आहे. ह्या कवितेत लोककवी मनमोहन नातू ह्यांनी त्यामागची कल्पना मांडलेली आहे. ती आपण इथे जास्त विस्तृतपणे वाचू शकाल.
ही कविता वाचली आणि जी चाल सहजपणाने सुचली ती इथे आपल्याला ऐकता येईल.


मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||

जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||

पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||

की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परि अभंग नदीच्या बाही ||६||

दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७

-- लोककवी मनमोहन नातू.

इथे चाल ऐका.

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

जागलं पाहिजे

तुषार जोशीच्या ह्या कवितेला सुचलेली एक झटपट चाल ऐका.

जागलं पाहिजे


आता कंटाळा खूप झाला
कामाला लागलं पाहिजे
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे


मला जमत नाही म्हणून
आता चिडायचं नाही
माझं कसं होईल असं
म्हणत कुढायचं नाही

कमकुवत शब्दांना
पुरून टाकलं पाहिजे
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे

येत नाही तिथे तिथे
प्रयत्न करीन म्हणायचं
सर्व अडचणींना
अगदी पुरून उरायचं

दुर्दम्य आशावाद
घेऊन जगलं पाहिजे
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे

  तुषार जोशी, नागपूर


इथे चाल ऐका

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

नको आणखी.

जयश्रीची ही नवी गजल वाचली  आणि त्यातल्या मला आवडलेल्या  काही निवडक द्विपदींचा समावेश करून  त्यांना लावलेली चाल ध्वनिमुद्रित केली. ऐकून सांगा  कशी वाटते.

नको आणखी

फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी


नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी

धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी

जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी

जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी

कवयित्री: जयश्री अंबासकर


शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९

नको फिरून बोलणे.

सोनाली जोशी उर्फ सुवर्णमयीची ही एक मस्त गजल वाचल्यावर साहजिकच तिला चाल लावाविशी वाटली.मूळ गजलेत एकूण ६ द्विपदी आहेत. मी फक्त पहिल्या चारांचाच ह्यात समावेश केलाय. ऐकून सांगता का कशी वाटली चाल?

नको फिरून बोलणे


नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे
नकोच तेच लाजणे नकोच दूर सारणे

इथे तुझ्याविना झुरून गप्प राहती फुले
लुटून गंध ने जरा.... हवे तुझे दुखावणे

तनामनात आजही तुझाच श्वास राहतो
फिरून आठवे मला तुझेच छेड काढणे

जशा सरी अधीरती बघून उष्ण ही धरा
तुला कधी जमेल का नभासमान भेटणे

किती बघायची तुझी इथे खुलून वाट मी?
वरून आठवायचे तुझे मधाळ बोलणे

निघू म्हणून अंगणात थांबतोस तू जरा
सुरूच राहते युगात त्या क्षणास गुंफणे

कवयित्री:सुवर्णमयी

चाल इथे ऐका.