शनिवार, २ एप्रिल, २०११

कळ्यांना जागवूनी बोलले दव

कळ्यांना जागवूनी बोलले दव
"उरे दो-चार घटकांचेच शैशव"

प्रिये, तोरा गुलाबाचा असावा
नि मोहाच्या फुलांचे धुंद आसव

अता उमलावयाची वेळ झाली
सख्याचे नादती बागेत पदरव

मधाचे बोट आता खूप झाले
उधाणू दे मधाचा मत्त अर्णव

दवाचा स्पर्श अन्‌ चुंबन अलीचे
कळी खुलते नि घडतो संगमोत्सव

धुक्याच्या चादरीने फूल झाकी
जणू उन्मीलितेचे तृप्त सौष्ठव

जराही ना दुखवता फूल खुडणे
असे याहून काही हस्तलाघव ?

किती, 'भृंगा', तुझी, रे, दांडगाई
अशा वेळी हवे रेशीम मार्दव...

कवी: मिलिंद फणसे

मिलिंदरावांची ही गझल वाचून मला स्फुरलेली चाल खाली ऐका. सोईसाठी काही निवडक द्विपदी घेतल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: