गुरुवार, २३ एप्रिल, २००९

सावली!

राघवची ही अजून एक सहजसुंदर रचना. वाचता वाचताच चाल सुचली.

सावली

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,
गारवेला गार वारा वाहतो सभोवती,
पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,
त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

कवी:राघव
चाल इथे ऐका.

रविवार, १९ एप्रिल, २००९

माझा वसंत!

क्रान्तिची ही अजून एक सुंदर रचना मला आवडली आणि मी ही चाल लावली. मराठीत गाजलेल्या एखाद्या गाण्यासारखीच वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ;) कारण चाल आपोआप उलगडत गेली. मुद्दामून वेगळी चाल लावावी असे नाही वाटले.

माझा वसंत

ग्रीष्मातल्या उन्हाची काही न खंत आता
आला फिरून आहे माझा वसंत आता

आताच मी मनाला समजावले जरासे
दु:खातुनी मिळाली थोडी उसंत आता

वारा फिरे भरारा माझीच गात गाणी
माझी कथा जगाला सांगे दिगंत आता

केव्हातरी सुरांशी जुळतील शब्द माझे
या कल्पनेत जगणे आहे पसंत आता

दाही दिशा उभ्या या उघडून सर्व दारे,
माझ्या मुशाफिरीला वाटा अनंत आता

कवयित्री:क्रान्ति
चाल इथे ऐका.


शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

चित्कला!

वारसे.

’वारसे’ ही मिलिंद फणसे ह्यांची अजून एक सशक्त गजल. गजल वाचताच चाल लावाविशी वाटली.

वारसे

गाव हा नाही तुझा, ना तुझी ही माणसे
सोड सारे, जा पुढे, पूस जाताना ठसे

कैकदा हृदयाहुनी भिंत ओली पाहिली
मी मनांचे पाहिले उंबरे बेजारसे

सावली शोधावया वृक्ष वणवणती इथे
अन् स्वतःला पाडण्या बिंब शोधी आरसे

जाहले आशीषही वास्तुपुरुषाचे मुके
सोयर्‍यांचे चेहरे कोरडे; मौनी घसे

वडिलधार्‍या सावल्या दे मला माध्याह्निला
ना तरी दे घन तमी वाट-चुकले कवडसे

पावसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहर्‍यावर काजळी, नेत्रही गर्भारसे

विहर तू बागेत पण विहर चिलखत घालुनी
भृंग, बाणांचे इथे फूल सांगे वारसे

कवी: मिलिंद फणसे
इथे चाल ऐका.

गुरुवार, १६ एप्रिल, २००९

लोपला स्वयंभू गंधार!

प्रशांत मनोहर हा एक उमदा कवी/लेखक आहे. त्याने लिहीलेल्या ’लोपला स्वयंभू गंधार ’ ह्या कवितेला मी लावलेली चाल ऐका....प्रशांतचे असे म्हणणे आहे की.....तंबोरा जेव्हा सुरात लागतो तेव्हा त्याच्या चार तारांतून एक सुंदरसा ’गंधार’ साकार होत असतो. ह्या कवितेत पहिल्या चार ओळींमध्ये जे वर्णन केलेले आहे तेही त्या गंधारबद्दल समर्पकपणे व्यक्त झालंय...म्हणूनच पाचवी ओळ कंसात घातलेय.

अनंगरंग !

अनंगरंग ह्या मनीषाच्या एका सुंदर कवितेला मी दोन चाली दिलेत. एक एकदम माझ्या सहजप्रवृत्तीविरुद्ध चाल दिलेय आणि दुसरी नेहमीचीच चाल आहे.. ऐकून सांगा कशा वाटताहेत.


अनंगरंग

धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो
प्रणयाचा पूर ही हृदयी या उधाणतो ।

स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो ।

उष्ण अधर कापती - रंगती कपोलही
मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो ।

झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।

विखूरले उशीवरी चांदणे अजूनही
न्हाऊनी प्रीतीत मन मोगराही उमलतो ।

बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |

कवयित्री: मनीषा
चाल इथे ऐका.
पहिली चाल


दुसरी चाल

गुरुवार, ९ एप्रिल, २००९

भूल!

बेसन लाडू ह्या टोपण नावाने लिहीणारा चक्रपाणी चिटणीस हा एक उत्तम गजलकार आहे. तो गद्यही तितक्याच समर्थपणे लिहीतो.
’भूल’ ह्या त्याच्या गजलेतच चाल दडलेली होती ती मी फक्त आपल्यासमोर मांडतोय.नेहमीप्रमाणे निवडक शेर घेतलेत चाल ध्वमुसाठी. :)

भूल

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता

हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता

मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो
(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता)

सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता

कवी:बेसन लाडू

चाल इथे ऐका.

सोमवार, ६ एप्रिल, २००९

प्रेमरंग!

प्रेमरंग ही सुवर्णमयीची अजून एक सहजसुंदर कविता वाचा आणि त्या कवितेची चालही ऐका.

प्रेमरंग

प्रेमरंग मज भिजवुन गेला उमलुन आले फूल नवे
आयुष्याच्या माळावर तृप्तीला आले कोंब नवे

तुला पाहण्या भिरभिर फिरतो , तुला भेटण्या बहाणे नवे
हृदयामध्ये तुझेच स्पंदन वाटे मजला हवे हवे

बोललीस तू हळूच काही..तिथे थांबले क्षण हळवे
डोळ्य़ामधुनी हसल्या ज्योती उजळून गेले लाख दिवे

आशेच्या फांदीवर माझ्या वसतीला चैतन्यपारवे
सखे व्यापले गगनालाही पसरून माझे पंख नवे

कवयित्री: सुवर्णमयी

रूपक तालातली चाल ऐका.

तूच सूर!

तूच सूर ही सुवर्णमयीचीच अजून एक आशयघन कविता आहे. मला चालही त्या कवितेतच सापडली.

तूच सूर

तूच सूर तुच साज, तूच गीत तूच प्रीत
जाणतो समीर धुंद ,तेच गीत तीच प्रीत

वाजते मधूर बीन , घालते कुणास साद
तोच चांद तीच रात , तोच छंद तोच नाद

धुंद फूल , धुंद पान , चांदणे कशात दंग
नाचले खुशीत भृंग ,उमटले पहा तरंग

ये मिठीत सोड रीत , आळवून मालकंस
बोलवी सखीस खास , डौलदार राजहंस

कवयित्री: सुवर्णमयी

चाल इथे ऐका.

तुझ्याविना!

सुवर्णमयीची तुझ्याविना ही कविता देखिल अतिशय भावपूर्ण आहे. ह्या कवितेला मी थोडीशी उडती चाल दिलेय. पाहा आवडतेय का?

तुझ्याविना

अंबरात चांदणे खुलेना तुझ्याविना
अंगणात या फुले फुलेना तुझ्याविना

खुळे प्रश्न अन्‌ खुळी उत्तरे
स्वप्न राहिले सखे अपुरे
या जगण्याचा मेळ जमेना.....तुझ्याविना

मौनाशी संवाद चालला
सूर सूर हा असे एकला
श्वासामधुनी गीत झरेना......तुझ्याविना

सुकून गेली सगळी माती
पडू लागले तडे भोवती
उदासरस्ता अता सरेना.....तुझ्याविना

चालून आलो कितीक अंतर
चालायाचे वणवण कुठवर
आयुष्याला दिशा मिळेना.....तुझ्याविना

कवयित्री: सुवर्णमयी

इथे ऐका चाल.

कसे मी जगावे!

सुवर्णमयी ह्या टोपण नावाने कविता लिहीणारी सोनाली जोशी ही देखिल एक उत्तम कवयित्री/लेखिका आहे. मनोगत ह्या संकेतस्थळावर ती नियमितपणे लेखन करते. कसे मी जगावे ह्या तिच्या कवितेतच चाल दडलेली होती. मी फक्त ती आपल्यासमोर मांडलेय.

कसे मी जगावे

कधी चित्र रंगाविना का खुलावे
सखे एकट्याने कसे मी जगावे ॥धृ॥

तुझे गीत ओठावरी खेळतांना
कधी पैंजणाना तुझ्या छेडतांना
अकाली कसे स्वप्न माझे तुटावे ॥१॥

न येती सरी त्या न तो धुंद वारा
उरे फक्त हा आठवांचा पसारा
तुझ्या आठवांनी किती मज छळावे.. ॥२॥

उभी अंगणी तू फुले वेचतांना
असा भास होतो कधी चांदण्यांना
चकोरापरी मी मनाशी झुरावे.. ॥३।

किती अंत माझा सखे तू पहाशी
रुसूनी असे का गडे दूर जाशी
सुखाच्या फुलांनी कसे मग फुलावे.. ॥४॥

कवयित्री:सुवर्णमयी
इथे ऐका चाल.

रविवार, ५ एप्रिल, २००९

घेऊन मेघ आता...

कुमार जावडेकरांची ही अजून एक आशयघन गजल जिच्यात तिची चाल दडलेली होती. मी फक्त तिला बाहेर काढली.

रंग मेंदीचा!

रंग मेंदीचा..ही अजून एक क्रान्तिची सुंदर अशी रचना आहे. त्यामुळे चाल लावताना फारसे कष्ट नाही पडले.

रंग मेंदीचा

रंग मेन्दीचा हातावरती अजून खुलतो कधी कधी
शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी

हिरमुसलेली रातराणी ही कधी अचानक मोहरते
निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी

खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी

वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी

कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती
फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी

तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे?
अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी?

कवयित्री: क्रान्ति

चाल ऐका.

दास!

क्रान्तिची अजून एक भक्तीरसपूर्ण कविता. ह्या कवितेची एकच चाल मी विलंबित आणि द्रूत अशा दोन तर्‍हेने ध्वनीमुद्रित केलेय. ऐकून सांगा कोणती आवडली.

दास!

या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा
आप, तेज, वायु, धरा, सार्‍यांतच भास तुझा

तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा

अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा
कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा

नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा
मनमोहन, यदुनंदन, यमुनातटी रास तुझा

तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा
देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा

कवयित्री: क्रान्ति

दोन्ही प्रकार इथे ऐका.
१)द्रूत!


२)विलंबित

सांज-राधा!

क्रान्तिची ही अजून एक आशयघन आणि कृष्णमय अशी कविता.मी रचलेली ही चाल कशी वाटतेय पाहा बघू.


सांज-राधा

त्या सांजकोवळ्या उन्हात सजल्या वाटा
गुणगुणती गीते तुझी निरागस लाटा

मावळतीवरती रंग नवे क्षितिजाचे
पाऊल वाजते हलके बकुळफुलांचे

माडांच्या छाया झुलती वार्‍यासंगे
जणु कृष्णसख्याचा रास आगळा रंगे

आसमंत भारित सूर मुरलीचे आले
कालिंदीचे जल थबके, कदम्ब डोले

तो मऊ मुलायम स्पर्श मयुरपंखांचा
दरवळतो हलका भास मधुर गंधाचा

या चराचराला जडली त्याची बाधा
श्रीरंग घन निळा, सांज सोनुली राधा

कवयित्री: क्रान्ति


ही चाल ऐका.

कृष्णमयी!

प्राजुची ही अजून एक सहजसुंदर रचना "कृष्णमयी". ह्या कवितेला देखिल चाल कवितेतच सापडली.

कृष्णमयी!

ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी
खेळतो मुरारी, पाठशीव..

हसत खेळत, अल्लड गोपिका
अव्खळ राधिका, कान्हा पाही..

घट डोईवर, चाले भराभर
नदी तीरावर, पाण्यासाठी..

भरूनिया कुंभ, घेता डोईवर
खडा घटावर, ट्णकारला..

भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग
निरखे श्रीरंग, राधिकेला..

चोरून ती उभी, अव्घड ओलेती
सावळ्याची मिठी, अंगभर..

मिटले नयन, सुटला पदर
थरारे अधर, चुंबताना..

म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका
झाली ही राधिका, कृष्णमयी..

पावरीचा सूर, आज दूर दूर
प्रणयाचा पूर, गोकुळात..

कवयित्री: प्राजु

चाल ऐका.

विसावा!

मिलिंद फणसे ह्यांची ही अशीच एक वेगळी गजल आहे "विसावा". ह्या गजलेची चाल देखिल तिच्यातच लपलेली होती असे वाटते. ऐकून सांगा, कशी वाटली?

विसावा

घे तुझ्या बाहूत शीतल, त्या जगी पोळून आलो
दे विसावा माय गंगे, राख मी होवून आलो

ही न वसने आवडीची, क्लेशदायक बंद ज्यांचे
रेशमाचे पाश ज्याचे वीण ती उसवून आलो

साथ अंबर, साथ तारे जे अनंताचे इशारे
मर्त्य, चकव्या सोबत्यांची साथ मी सोडून आलो

स्फुंदणाऱ्या लेखणीला सत्य हे सांगू कसे की
कोरडी झालीस तू अन् मी रिता होवून आलो

शब्दही देती दगा का, भृंग, ब्रह्मास्त्राप्रमाणे
शाप कोणा भार्गवाचा का शिरी घेवून आलो ?

कवी: मिलिंद फणसे

चाल ऐका!

तांडव!

तांडव ही प्राजुची कविता वाचताच त्याला त्याच प्रकारची चाल लावावीशी वाटली. मात्र सगळी कडवी न घेता काही निवडक कडवी घेऊन चाल रचलेय. पाहा आवडते काय ती?

तांडव

दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार
नित्य होती वार जैसे घुमे तलवार..

वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार
कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार

जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार
कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार

'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार
कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार

युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार
जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार

रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार

जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार
मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..

कवयित्री: प्राजु


भूल!

जयश्रीची ही अशीच एक भावपूर्ण कविता वाचा. ह्या कवितेला मी जरा उडती चाल लावलेय. कितपत जमलेय सांगा बरं.

भूल

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला
बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला

चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली
बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली

सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा
मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला

यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला
धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला

शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली
का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले

कवयित्री: जयश्री अंबासकर

चाल ऐका.

मधुराभक्ती!

क्रान्तिची ही अजून एक सुंदर आणि भावपूर्ण कविता.कविता वाचता वाचताच चाल साकारत गेली.


मधुराभक्ती

मज ध्यास दर्शनाचा रे, ना कसलीही आसक्ती
अंतरात माझ्या वसते, मीरेची मधुराभक्ती

मी गीत तुझे गुणगुणते
चैतन्य जणू रुणझुणते
गीतातून माझ्या करते तव प्रीतीची अभिव्यक्ती

तन राही जरी संसारी
मन घेते गगनभरारी
एकाच ठायी अनुभवते आसक्ती आणि विरक्ती

काळोख मनाला ग्रासे
हा जन्मही शापच भासे
तुजवाचून जगण्याचीही उरली ना इच्छाशक्ती

सर्वस्व तुला अर्पावे
आयुष्य इथे संपावे
तुजसाठी पुन्हा उमलाया, या जन्मि मिळावी मुक्ती
कवयित्री: क्रान्ति

खालील विजेटवर चाल ऐका.

प्रेमे नादली पंढरी!




राघव ह्या टोपण नावाने लिहीणारा राहुल पाटणकर हा देखिल एक उमदा कवी आहे. ह्याचा नैसर्गिक कल अध्यात्माकडे असावा त्यामुळे त्याच्या कविता भक्तीरसमय असतात. त्याची ही कविता वाचून जी चाल सुचली ती ऐका..   विवेक काजरेकरांच्या आवाजात.
विवेक काजरेकरांनी ह्या गीताला जो संगीत-साज चढवला आहे तो पूर्णपणे संगंणकीय पद्धतीने.
ह्यात दिमडी,एकतारी,झांज,सतार आणि वायोलिन्सचा वापर केलाय. अर्थात ह्यात प्रत्यक्षपणे कोणतीच वाद्ये वापरलेली नाहीत.


प्रेमे नादली पंढरी

मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी,
प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!

मी बालक अजाण मन सोडीना पदर!
माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?

दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची!
उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!

अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा!
मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!

कवी:राघव



सुवर्णप्रभा!

सुवर्णप्रभा ही प्राजुची कविता वाचली आणि लक्षात आले की ह्या कवितेला केवळ एकच नाही तर त्याहुनही जास्ती चाली लागू शकतात.मग करू या काय प्रयोग? प्रयोगांती तीन वेगवेगळ्या चाली तयार झाल्या.

सुवर्णप्रभा

लाल केशरात रंग खेळते पहाट खास
दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस...

तारकांत लोपली निशा उषेस पाठवून
अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस...

सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण
विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास...

वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद
सांडताच पारिजात भूवरी पडेल रास...

थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब
का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ...

सागरात गाज आणि लाट जात उंच उंच
गारवा हवेत आणि वेड लागते मनांस...

पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत
मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...

दाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान
स्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास...

कवयित्री: प्राजु

ऐका तर तीन वेगवेगळ्या चाली.
चाल क्रमांक-१

चाल क्रमांक-२

चाल क्रमांक-३

दिवाळी गीत

जयश्रीचे २००८मध्ये दिवाळी ई-शुभेच्छापत्र आले आणि त्यावरील कविता वाचून लगेच चाल सुचली. बघा आवडतेय का?
खाली चित्र स्वरूपात कविता आहे.

उजळू निशा!

दीपिका जोशी ह्या एक समर्थ लेखिका/कवयित्री आहेत. लिहीतात मोजकेच पण दर्जेदार. खरे तर स्वत:चे लेखन करायला त्यांना फारसा वेळ मिळत नाही कारण अभिव्यक्ती आणि अनुभूति ह्या दोन हिंदी ई-साप्ताहिकाच्या त्या सहसंपादिका आहेत.
त्यांनी मला २००८मध्ये दिवाळी शुभेच्छा-पत्र पाठवले होते(खाली चित्र दिले आहे) त्यावरील मजकुर हा कवितेच्या स्वरूपात होता. तो वाचता वाचता त्याला चाल सुचली आणि ती लगेच ध्वमु देखिल केली. पाहा जमलेय का ते.

रिता गाभारा .....

मनीषा ही मिसळपाव ह्या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन/कविता करत असते. "रिता गाभारा ....." ही तिची कविता वाचताक्षणी तिला चाल लावावीशी वाटली असे म्हणण्यापेक्षा ती चाल त्या कवितेतूनच आपोआप साकार होत गेली. मी केवळ निमित्तमात्र उरलो.

रिता गाभारा .....

देहात माझीया हा
चंद्र वितळून गेला ।
अन अंतरी मोगराही
सुगंध मिसळून गेला ।

झुकवुनी लाख पाहिले
नजरेस मी माझीया ।
तीर तुझ्या नजरेचा
काळजास वेधून गेला ।

बेरंगी दुनियेचा ना
कायदा मी मोडला ।
इशाराच एक तुझा
मज हाय रंगवून गेला ।

वेचियेली मी दुःखेही
माझ्या दोहो करांनी।
फासा दुर्दैवाचा मज
दान देऊन गेला ।

ओळखले नसे कधीही
माझ्याच मी जगाला ।
सौख्याचा क्षण मजला
नेहमीच फसवून गेला ।

गर्दीत अनोळख्यांच्या
मज मैत्र एक भेटला ।
जीवलगच तो जीवाचा
मग घाव घालून गेला ।

लाविले कसास माझ्या
मी प्रत्येक श्वासाला ।
क्षणाक्षणांनी काळही
मजला परखून गेला ।

शोधियले त्रिखंडात मी
त्याच सर्वेश्वराला ।
-हुदयीचा गाभारा पण
रिताच राहून गेला ।

कवयित्री: मनीषा
रूपक तालात गायलेली चाल इथे ऐका.

थांबलो आहे.

कामिनी केंभावी ही देखिल अशीच एक मनस्वी कवयित्री आहे. मायबोली आणि मनोगत ह्या संकेतस्थळांवर ती नियमितपणे लेखन करत असते. श्यामली ह्या टोपण नावाने ती लेखन करते.
"थांबलो आहे" ह्या मला आवडलेल्या तिच्या गजलेला मी चाल बांधलेय(नेहमीप्रमाणे निवडक शेर घेतलेत)..कशी वाटतेय ते सांगा.

शनिवार, ४ एप्रिल, २००९

एक भावगीत!

मिसळपाव ह्या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन करणारे रामदास अधून मधून कविताही करतात. त्यातलीच एक कविता "एक भावगीत" वाचताच मला सुचलेली चाल माझ्या नेहमीच्या चालींपेक्षा जरा वेगळीच आहे असे मला वाटते.

एक भावगीत

मला सोसेना उबारा ...मला सोसेना हिवाळा
मी होऊन खारोटी
तुझ्या ओंजळीत
घेईन विसावा.
* * * *
मला सोसेना दुरावा .... मला सोसेना दुरावा
मी होऊन चांदणे
तुझ्या अंगणात
मागेन जोगवा.
* * * *
माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ
मी रंगून विड्यात
तुझ्या ओठावर
सांगेन ओळख.

कवी: रामदास



खालील विजेटवर चाल ऐका.

सूर भैरवीचे!

क्रान्ति ही मिसळपाव ह्या संकेतस्थळावर नियमितपणे सुंदर सुंदर कविता लिहीत असते. तिची "सूर भैरवीचे" ही कविता वाचताक्षणी मला सहजपणे जी चाल सुचली ती भैरवीतलीच होती आणि ते नैसर्गिकही होते.

हुरहुर!

अरूण मनोहर हे देखिल महाजालावरचे लेखक/कवींमधले एक परिचित नाव. मनोगत,मिसळपाव सारख्या नामांकित संकेतस्थळावर ते नियमितपणे लेखन करत असतात. त्यांच्या "हुरहुर" ह्या कवितेला चाल लावताना नेहमीप्रमाणेच मी काही कडवी गाळलेली आहेत.

हुरहुर

स्वप्नातली फुले ती, सत्यात कां न दिसली?
मज जाग जरा येता, ती रात कां हरवली?

रात्रीत प्यायले होते, मी अश्रु यक्षीणीचे
विरही व्यथेत ओले, मृदुगंध पापणीचे
येता रवी उदयास, ती आसवेही सुकली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक
कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख
ती उजळताच प्राची, सावली अंतरी धरली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

मज सूर गवसला जो, कोठे हवेत विरला?
ती साद ऐकू ये ना, स्वप्नील भाव सरला
जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो
मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो
अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

स्वप्नामधील सत्य, गवसेल कधी कोणां?
कधी बंद होई वेडा, जागेपणाचा बहाणा?
झोपेत जगूनी नंतर, ती धुंदी कां उडाली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?

कवी: अरूण मनोहर

ह्या गीताची चाल खालील विजेटवर ऐका.

रोषणाई !

मिलिंद फणसे हे अजून एक महाजालावरचे नामांकित कवी. गजला,कविता-लेखन ते नियमितपणे मनोगत ह्या संकेतस्थळावर करतात. त्यांची "रोषणाई" ही गजल सामाजिक दांभिकतेवर वार करते.गजलेतले दोन शेर मी सोडून दिलेले आहेत कारण ...तेच. माझी तोकडी प्रतिभा. बाकी मुखडा आणि तीन शेरांचा समावेश मी ध्वनीमुद्रणात केलाय

विठू सांगे...



 विवेक काजरेकरांच्या आवाजात ही चाल ऐका. ह्यातलं संगीत संयोजनही त्यांनीच स्वत:च्या संगणकावर केलंय.





प्राजु उर्फ प्राजक्ता पटवर्धन ही देखिल ह्या महाजालावरील एक सशक्त लेखिका/कवयित्री आहे. मनोगत, मिसळपाव अशा नामांकित मराठी संकेतस्थळांवर ती लेखन करत असते. "विठू सांगे" ही तिची कविता..खरे म्हणायचे तर हा अभंग वाचून मला चाल स्फुरली (जय संत प्राजु). पण हा अभंग इतका लांबलचक आहे की सर्व कडव्यांना वेगवेगळी चाल लावायची म्हणजे माझी (नसलेली) प्रतिभा तोकडी पडायला लागली. ;) म्हणून मग मी निवडक कडवी घेऊन चाल रचली.

विठू सांगे...

आषाढाचा मास । दर्शनाची आस ।
होती तुझे भास । पांडुरंगा । ।

साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री ।
दिवसा नि रात्री । रूप तुझे । ।

खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी ।
वसतो पंढरी । विठू राया । ।

भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । ठेवोनिया । ।

काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।

नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।

घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।

तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।

काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।

श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।

प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा श्रम भक्ती । विठू सांगे । ।

जाणा एक सर्व । विश्व हाच देव । ।
सांगे ज्ञानदेव । सकलांना । ।

प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।

कवयित्री: प्राजु

नूर!

कुमार जावडेकर हे उतम गजला करतात. मनोगत ह्या संकेतस्थळावर मी त्यांची "नूर" ही गजल वाचली आणि त्या गजलेला चाल लावण्याची उर्मी आली.


भास!

अनिरुद्ध अभ्यंकर हे मराठी संकेतस्थळावरील अजून एक सुप्रसिद्ध कवी. जितके उत्तम ते काव्य करतात तितकेच उत्तम आणि शीघ्रपणे ते विडंबनही करतात. केशवसुमार ह्या नावाने ते विडंबन करतात. त्यांची "भास" ही कविता मिसळपाव ह्या संकेतस्थळावर वाचली आणि मला तिला चाल लावावीशी वाटली.


उत्तरायण!

सुमति वानखेडे. अजून एक मराठी संकेतस्थळांवरील समर्थ कवयित्री आणि लेखिका. ह्यांचे प्रत्येकी दोन कवितासंग्रह, दोन चारोळीसंग्रह आणि दोन कथासंग्रह पुस्तकरुपाने प्रसिद्ध झालेत. त्यांचीच "उत्तरायण" ही कविता मी मनोगत ह्या संकेतस्थळावर वाचली आणि मला तिला चाल लावावीशी वाटली.

उन्मुक्त!

सौ.जयश्री कुलकर्णी-अंबासकर! महाजालावरील मराठी संकेतस्थळांवरची एक लोकप्रिय कवयित्री!
सुप्रसिद्ध संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा एक संच आहे "स्पर्श चांदण्यांचे". त्यात जयश्रीची दोन स्वतंत्र गाणी आहेत आणि एका द्वंद्व गीतातही तिचा अर्धा सहभाग आहे.ही गाणी सुप्रसिद्ध गायक श्री.सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणी ह्यांनी गायलेली आहेत.
तिच्या गीतांचा एक संपूर्ण संच "सारे तुझ्यात आहे" ह्या नावाने प्रसिद्ध झालाय. संगीतकार आहेत अभिजित राणे आणि गायक गायिका आहेत स्वप्नील बांदोडकर,देवकी पंडीत आणि वैशाली सामंत.
तसेच "तुझा चेहरा" ह्या गायिका संगीता चितळेने गायिलेल्या गीत संचात जयश्रीचे एक गीत आहे.
अशा ह्या सुप्रसिद्ध कवयित्रीच्या "उन्मुक्त" ह्या कवितेला मला चाल लावायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.



हे गजवदना!

प्रसाद शिरगांवकर हे सद्याच्या तरूण कवींमधील एक आघाडीचे नाव आहे. त्यांची "हे गजवदना" ही कविता मला खूप आवडली. योगायोग असा आहे की ह्या गीताला लावलेली चाल ही माझ्या आयुष्यातील पहिली-वहिली ध्वनीमुद्रित चाल आहे. एक छंद म्हणून मी कवितांना ह्या आधीही चाली लावलेल्या आहेत; पण ते सर्व केवळ मजेखातर होते. मग ही चाल का बरे ध्वनीमुद्रित केली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?(नाही,पडला नसेल तरी हरकत नाही. ;) ) तर ऐका.

माझे एक मित्र आहेत. ते एक उत्तम संगीतकार आहेत. विवेक काजरेकर असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याशी संगीतावर(मुलगी नव्हे हो!:D ) चर्चा करताना त्यांनी मला ही कविता ऐकवली आणि म्हटले की सद्या ह्या गीताला चाल लावतोय पण सलग असा वेळ मिळत नाहीये. त्यामुळे काम अर्धवटच राहीलंय. गंमत म्हणून मी त्यांना म्हटले की, " द्या ती कविता मला. मी लावतो चाल त्याला. आहे काय आणि नाही काय?"
त्यांनीही गंमतीतच मला ती कविता दिली आणि मी लगेच तिला चाल लावली. पण त्यांना ऐकवणार कशी? मग त्यांनीच मला ती ध्वनीमुद्रित करायला सांगितले. त्यानंतर त्याचे रुपांतर मप३(एमपी३) मध्ये कसे करायचे हे देखिल सांगितले आणि मग मी त्याप्रमाणे करून माझ्याच आवाजात ती चाल ध्वनीमुद्रित करून त्यांच्याकडे पाठवली.यमन रागातली ही चाल त्यांना आवडली. पहिलीच चाल यमन सारख्या प्रसन्न रागाने झाली हा एक निव्वळ योगायोग आहे. असो. तर अशी ही माझ्या पहिल्या-वहिल्या गीताची चित्तरकथा आहे.




हीच चाल मुग्धा कारंजेकरने केवळ तानपुर्‍याच्या साथीने अतिशय सुरेलपणे सादर केलेय...ऐका. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कृपया त्या व्यक्त कराव्यात अशी पुन्हा एकदा विनंती.