रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

पळा पळा पुढे पळे तो


जुळवत मी, ता समोर ता
रचत राहतो नुसत्या कविता ..

तुम्हीच म्हणता येताजाता
का करता हो असल्या कविता ..

हे नुसते रचणे, ता समोर ता
तुम्हास वाटे अर्थहीनता ..

जर सोपे ते लिहिणे कविता
बसती सारे खरडत कविता ..

दिसले असते सर्वत्र कवी
एकही वाचक उरला नसता .. !

कवी: विजयकुमार देशपांडे

आयुष्याचे अर्थ जस जसे लागत गेले...

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०१५

नशिबात दु:ख हुकमी घेऊन मीच हरतो


ज्योतीस मालवूनी अंधार रोज करतो
झाले असह्य जगणे मी त्या यमास स्मरतो ..

आम्हास न्याय देवा देसी न तू कधीही
सुख धाडसी पळीभर दु:खात ऊर भरतो ..

शोधात का सुखाच्या सारे गमावले मी
दु:खास आपलेसे करुनी सदैव फिरतो ..

जो तो इथे असामी धुंदीत आपल्या का
गुंगीत वेदनेच्या मी एकटाच झुरतो ..

टपलेत येथ सारे दुसऱ्यास दु:ख देण्या
केव्हातरी सुखाला पाहुन मनात डरतो ..

का वेळ लागतो त्या जिंकावया सुखाला
नशिबात दु:ख हुकमी घेऊन मीच हरतो ..

कवी: विजयकुमार देशपांडे